Rahul Gandhi on CJP Protest: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने सोमवारी उग्र स्वरुप धारण केले होते. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती. त्यासाठी संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतरमंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला होता. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, "विद्यार्थ्यांचा भविष्याचा मुद्दा आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांना चर्चेची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना चर्चेसाठी सरकारची परवानगी लागते म्हणजे काय ते ओळखा. मुलांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. काल जे काही घडलं त्यावर मोदींनी अद्यापही माफी मागितलेली नाही. मोदी शांत का आहेत? त्याचे नेमके कारण काय आहे?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राहुल गांधी यांनी पुढे बोलताना सांगितले की, "विद्यार्थी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत ती योग्यच आहे. पंतप्रधानांनी माफी मागावी आणि यंत्रणांचा मूर्खपणा थांबवावा. तरुण आंदोलकांना वागवण्याची ही पद्धत नाही," असा हल्लबोल देखील त्यांनी केला.
Rahul Gandhi on CJP Protest: गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा
"अदानी, अंबानी आणि आरएसएसमुळे भविष्य नाही असे तरुण म्हणत आहेत. अंध:कारमय भविष्याबाबत मुले तक्रार करत आहेत. त्यामुळे गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा," अशी मागणी देखील राहुल गांधी यांनी केली आहे. आता राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजप काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


प्रतिक्रिया द्या